Vishwas Nangare Patil : राज ठाकरेंसह टीकाकारांना विश्वास नांगरे पाटलांचं सडेतोड उत्तर; संघाच्या कार्यक्रमाला हजेरी का? पहिल्यांदाच सविस्तर बोलले!
नागपूर : नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर संघाच्या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणावरून झालेल्या वादाला प्रथमच सविस्तर उत्तर दिले. 19 एप्रिल रोजी नवी मुंबईतील सानपाडा येथे झालेल्या कार्यक्रमात आपण केलेले भाषण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत होते. कोणत्याही नियमांचा भंग केला नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला.
विश्वास नांगरे पाटील म्हणाले, "हा कार्यक्रम 19 एप्रिल रोजी सानपाडा येथे झाला होता. या कार्यक्रमासाठी मला प्रथितयश व्यक्तींनी निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण आजही माझ्याकडे आहे. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर रात्री साडेआठ वाजता मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मी केवळ एका विशिष्ट संघटनेच्या कार्यक्रमालाच जात नाही. रमजान, बौद्ध, ख्रिश्चन तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी नियमित सहभागी होत असतो. समाजप्रबोधन करणे आणि सकारात्मक विचार मांडणे हे माझे कर्तव्य आहे."
विश्वास नांगरे पाटील यांनी पुढे म्हटलं की, "त्या कार्यक्रमात 'मी तिथे उपनिषदमधील एक मंत्र सांगितला, प्रेम, सेवा ही आपली संस्कृती, मी त्या भाषणात ज्ञानेश्वरी पण सविस्तर बोललो, ड्रग्सवर बोललो, हा रचनात्मक चांगला कार्यक्रम होता. वंदे भारत आणि संघाचे शताब्दी वर्ष यावर बोललो, तरुणांना ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्याची गरज असल्याचे सांगितले."
नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांना भाजप नेत्यांनी अर्बन नक्षल म्हणून त्यांना संबोधलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांकडून एन्काऊंटरची भीती व्यक्त केली. त्यावरही विश्वास नांगरे पाटील यांनी भाष्य केलं. "प्रत्येकाचा आम्हाला आदर आहे आणि सन्मान आहे. मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता ही भारतीय संविधानाशी आणि संविधानाच्या मूल्यांशी आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे आणि त्यांच्या विचारांशी, तत्त्वांशी आणि घटनेच्या मूल्यांचे आम्ही पाईक होतो आणि आहे आणि राहू," असं ते म्हणाले.
दरम्यान, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकून ही जबाबदारी दिली आहे. मी संत्रानगरीतील प्रत्येक नागरिकासाठी काम करणार आहे. नागपूरची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल. कोअर पोलिसिंग प्रभावीपणे राबविण्यावर भर राहील. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक पोलीस हा गणवेशातील नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशाविना पोलीस आहे, या भावनेतून सर्वांना सोबत घेऊन टीम म्हणून काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. सध्या 'ऑपरेशन थंडर' सुरू असून विद्यार्थ्यांना ड्रग्सपासून दूर ठेवणे, महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि पुराव्यावर आधारित पोलिसिंगला प्राधान्य दिले जाईल. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यावर भर राहील. पोलीस कर्मचारी हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या अंगावर हात टाकणे म्हणजे माझ्यावर हात टाकण्यासारखे आहे. मात्र प्रत्येक कारवाई कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जाईल," असेही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.




Comments (0)
Facebook Comments (0)