महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी! अमित शाहांसोबतच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब?
सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार? महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवले असले तरी, सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. खातेवाटपाच्या कळीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे महायुतीच्या नेत्यांना पुन्हा दिल्लीला जावे लागणार असल्याचे वृत्त आहे.
सत्ता स्थापनेत विलंब
निवडणूक निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला असतानाही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. मागील आठवड्यात झालेल्या चर्चेनंतरही भाजपकडून शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली. मात्र, खातेवाटप आणि नेतृत्वावरून चर्चेचा तिढा कायम आहे.
दिल्लीतील महत्त्वाच्या हालचाली
मागील गुरुवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांनी आपला प्रस्ताव सादर केला. सूत्रांच्या माहितीनुसार, खातेवाटपावर अंतिम निर्णय होण्यासाठी येत्या 24 तासांत महायुती नेत्यांची पुन्हा दिल्ली भेट होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील वातावरण तापलं
शिंदे गट आणि अजित पवार गटाने आपापल्या गटनेत्यांची निवड केली आहे. मात्र, भाजपने अद्याप गटनेता जाहीर केलेला नाही. खातेवाटपावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे ही दिल्ली भेट सत्ता स्थापनेच्या दिशेने निर्णायक ठरेल का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)