भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलने बांगलादेशच्या सामन्यानंतर एक खास भेट प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला दिली. तीन नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ फेरीमधील सामन्यात विजय मिळवल्यानंतर कोहलीने लिटन दासला आपली बॅट भेट म्हणून दिली. अॅडलेडच्या मैदानावरील रंजक सामन्यानंतर कोहलीने लिटनच्या फलंदाजीचं कौतुक करत त्याला हे खास गिफ्ट दिलं.

भारताने १८४ धावांचा डोंगर उभारल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना लिटनने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या लिटनने २१ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरं केलं. लिटनच्या या फलंदाजीमुळे डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीनुसार बांगलादेशचा संघ निर्धारित धावसंख्येच्या पुढे होता. सात षटकांनंतर पावसामुळे सामना थांबला तेव्हाही बांगलादेशचा संघ आघाडीवर होता.

लिटनने २७ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. के. एल. राहुलच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे पावसानंतर सामना सुरु झाल्याच्या दुसऱ्याच चेंडूवर लिटन धावबाद झाला. लिटन बाद झाल्यानंतर बांगलादेशला डाव सावरता आला नाही आणि ते पाच धावांनी पराभूत झाले. या सामन्यामध्ये विराटला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर विराटने स्वइच्छेने लिटनला आपली बॅट भेट दिली.

“आम्ही डायनिंग हॉलमध्ये बसलेलो असताना विराट कोहली आला आणि त्याने लिटनला बॅट भेट म्हणून दिली,” असं जलाल युनूस यांनी सांगितल्याचं वृत्त ‘बीडीक्रिकटाइम बांगला’ने दिलं आहे. युनूस हे बांगलादेश क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आहेत. युनूस यांनी विराटच्या या खेळाडूवृत्तीचंही कौतुक केलं आहे. “माझ्या मते लिटनसाठी हा क्षण फार प्रेरणादायी आहे,” असं युनूस यांनी म्हटलं.

युनूस यांनी लिटनच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. “लिटन हा उत्तम फलंदाज आहे. त्याने अनेक सुंदर फटके मारताना आम्ही पाहिलं आहे. तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही उत्तम खेळतो. नुकतीच त्याने आपली टी-२० क्रिकेटमधील कारकिर्द सुरु केली आहे,” असं युनूस म्हणाला.