महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजित पवारांकडून बाबासाहेबांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजित पवारांकडून बाबासाहेबांना अभिवादन

बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

“आज घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज तुमचा-माझा भारत देश एकसंघ राहिला आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे वातावरण आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते आहे. सर्वधर्म समभाव हीच भूमिका घेऊन बाबासाहेबांनी शेवटपर्यंत त्यांची वाटचाल सुरू ठेवली होती”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे होती. त्यावेळी मी अर्थमंत्री असताना त्यांना नेहमी सांगायचो, की इंदू मिल इथे होणारे बाबासाहेबांचा स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नाही. मात्र, आता सरकार बदलले आहे. आम्ही आता विरोधीपक्षात आहोत. आमची अपेक्षा आहे की सरकारनेही या प्रकरणात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण आणू नये. यावरून आरोप-प्रत्यारोप होता कामा नये”, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच बाबासाहेबांच्या नावला साजेसं असं स्मारक व्हायला हवं, असेही ते म्हणाले.