“कुणाच्या बापाला घाबरत नाही, मला जे..”

“कुणाच्या बापाला घाबरत नाही, मला जे..”

आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे काही आमच्या पक्षाबाबत सांगायचं आहे ते आम्ही सांगू इतरांनी त्यात पडू नये असं अजित पवार यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता सुनावलं होतं. यानंतर आता संजय राऊत यांनी आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत असं उत्तर देत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
“महाविकास आघाडी ही तीन पक्षांची आहे. महाविकास आघाडीचे आम्ही चौकीदार आहोत असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना हे पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा आम्ही एकत्र असतो. शिवसेना फुटत असताना शरद पवार किंवा अजित पवार, नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केलीच होती. तशीच आम्ही चिंता व्यक्त केली ” असं म्हणत संजय राऊत यांनी अजितदादांना दिलं आहे.

माझ्यावर कशाला खापर फोडता आहात?
महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडलं जातंय? मी महाविकास आघाडीबाबत काय चुकीचं बोललो? शिवसेना फुटत होती तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. आपल्या बरोबरचा घटकपक्ष मजबूत रहावा त्याचे लचके तोडले जाऊ नयेत ही आमची भूमिका असेल आणि कुणी याबाबत आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मी कुणाच्या बापाला घाबरत नाही
रविवारी मी जे रोखठोक लिहिलं त्यामुळेच भाजपाचं ऑपरेशन लोटस बॅकफूटवर गेलं. बंगाल, महाराष्ट्र आणि बिहार या ठिकाणी हेच चाललं आहे. आम्ही सगळे या षडयंत्राला लढण्यासाठी तयार आहोत. मी जर खरं बोललो आहे म्हणून मला कुणी टार्गेट करत असेल तरीही मी खरं बोलत राहणार. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मला जे बोलायचं आहे ते बोलत राहणार. असंही संजय राऊत यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

मी काय चुकीचं बोललो? काय चुकीचं लिहिलं?
हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, प्रफुल पटेल यांना विचारा जाऊन की तुमच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव आहे की नाही? अजून किती नावं देऊ तुम्हाला? आमच्यासारखे लोक जर याबाबत प्रश्न विचारत आहेत. तर भाजपाला राग आला पाहिजे इतर कुणाला नाही. माझ्या भूमिकेवर अजित पवार कसे प्रश्न उपस्थित करतात? शरद पवारांनी मला विचारलं काही सल्ला दिला तर मी तो मान्य करेन. ऑपरेशन लोटसबाबत मी लिहिलं तर चुकीचं काय? विरोधी पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होतोय की नाही याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.