मंदिर उघडणार,पण नियम सक्तीचे
मुख्यमंत्र्यांची पाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांना भेट
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून योग्यवेळी धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी देऊ असं सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र अखेर राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
मंदिरे उघडणार असल्याने संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे. शहरातील नागरिकांमध्ये दिवाळीचा उत्साह असल्याने मंदिर उघडणार असल्याच्या बातमीमुळे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीच्या काळात हजारो भाविक पुण्यातील दगडूशेठ गणपती, सारसबाग गणपती, चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर,आकुर्डीतील म्हाळसादेवी व इतर मंदिरांमध्ये गर्दी करतात. यंदाच्या दिवाळीत बाहेरून दर्शन घेत आहेत. मंदिरे कधी उघडणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडणार पण नियम पाळणे बंधनकारक असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पाडव्यापासून मंदिरे सुरु होणार असली तरी त्यासाठीचे नियम पाळणे देखील बंधनकारक आहे. गर्दी न करता स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करा. मंदिरात गर्दी होणार नाही ना सर्वाना नीट प्रवेश मिळेल याची काळजीही मंदिर प्रशासनाने घेणे महत्वाचे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.




Comments (0)
Facebook Comments (0)