टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही

टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट अजित पवारांवर टीका केली होती. आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, याबाबत बोलताना ‘टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवारांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले आहे. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. तसेच हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही. त्यामुळेच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाकडून अनेक ठिकाणी निर्देशने करण्यात येत आहेत. दरम्यान, काल अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना नितेश राणेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, ‘टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील, असं ते म्हणाले होते.