भारत बंद ला शिवसेना काँग्रेस बरोबरच, बाजार समित्यांचाही पाठिंबा
नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' (Bharat Bandh 8 December) पुकारण्यात आला आहे.
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याराज्यातील सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत त्याचबरोबर राज्यातील अनेक बाजार समित्यांनी उद्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे.
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे.
या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी दिलेलं योगदान महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वजण घरात असूनही जनतेला भाजीपाला उपलब्ध होत होता. लॉकडाऊन असूनही सर्वाना भाजीपाला मिळावा म्हणून शेतकरी शेतात राबत होता. हे विसरून चालनार नाही.असेही ते म्हणाले.
राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलं आहे की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.
भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला 8 डिसेंबरला या सेवा मिळणार नाहीत. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी नेते बलदेव सिंह यांनी दिली. दिल्ली मध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटत आहेत. माथाडी कामगार आणि व्यापारी संघानेही या बंद मध्ये सहभाग घेत हे आंदोलन अधिक तीव्र केले आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)