सत्तेतून पायउतार होताच भाजपला लागला शोध

सत्तेतून पायउतार होताच भाजपला लागला शोध

 पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) २०१७ ला प्रथमच भाजप (BJP) सत्तेत आला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून, आता कमी दाबाने पुरवठा होऊ लागला आहे. महापालिकेची मुदत संपल्याने १४ मार्चपासून शहरात प्रशासकांचा कारभार सुरु झाला आहे. या प्रशासकीय कालावधीत भाजपला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) शहरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे. त्यावर हा भाजपचा जावईशोध असून आपले अपयश लपविण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवा दी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.

प्रशासकाने महापालिका ताब्यात घेऊन आठ दिवस उलटत नाहीत तोच संपूर्ण शहरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने आयुक्त राजेश पाटील यांच्यावर दबाव टाकून पाण्यावरून भाजपला बदनाम करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप पवार यांनी काल (ता.23) केला. गेल्या आठ दिवसांपासून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.राष्ट्रवादीधार्जिणे ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांमुळे तो होत आहे. त्यातून रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर, महात्मा फुले नगर या आपल्या प्रभागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, आयुक्तांनी पूर्णानगर, संभाजीनगरची काल पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पाण्याबाबत पवारांशी चर्चा केली. पूर्ण दाबाने आणि पुरेसा वेळ पाणीपुरवठा करावा. संबधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी पवार यांनी केली.

अंबानी अन् संघाच्या नेत्यांकडून तीनशे कोटींची ऑफर! राज्यपालांचा गौप्यस्फोट
पवार यांचा आरोप राष्ट्रवादीच्या गव्हाणेंनी फेटाळून लावला. पाच वर्षापूर्वी निवडणुकीला सामोरे जाताना २४ तास पाणी देऊ,असे आश्वासन भाजपने दिले होते. त्याचे काय झाले,अशी विचारणा करीत आंद्रा आणि भामा-आसखेड धऱणातून ते पाणी आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजवटीत दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला,असे गव्हाणे म्हणाले. अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखविण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.पाण्याच्या आश्वासनावर त्यांना सत्ता दिलेल्या मतदारांचा त्यांनी विश्वासघात केला आहे, असा हल्लाबोल गव्हाणेंनी केला.

आमची मर्दाची पद्धत..! क्षीरसागरांचा पहिला वार चंद्रकांतदादांवर
दरम्यान, उन्हाळ्यात मागणी वाढल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, गढूळ पाणी, व्हॉल्व लिकेज, पाईपलाईन फुटणे आदी तक्रारी येत असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. म्हणून त्या सोडविण्यासाठी त्यांनी २४x७ एक स्वतंत्र हेल्पलाईन (क्र.७७२२०६०९९९) सुरू केली आहे. पाण्यासंदर्भात काही तक्रारी असतील त्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख तथा सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.