बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगेच्या पाण्याचे भगिरथ....

बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगेच्या पाण्याचे भगिरथ....

दिनांक ३० जून २०२१ रोजी पुणे मनपाच्या हद्दी लगतची २३ गावांची अंतिम अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध करून २३ गावे पुणे मनपात समाविष्ट करून घेतली गेली. यात सुस आणि म्हाळुंगे या गावांचा देखील समावेश होता.

सुस आणि म्हाळुंगे ही गावे मनपात गेल्या अवघ्या आठ दिवसांतच पालिकेच्या माध्यमातून या गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या भागाचे नगरसेवक माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरेसाहेब यांनी मनपा प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला.

त्यांनी ८ जुलै २०२१ रोजी मनपा आयुक्त विक्रमकुमारसाहेब यांना पत्र लिहून सुस आणि म्हाळुंगेतील साठवण टाक्यापर्यंत बाणेर येथील मुख्य जलवाहिनीतुन १२ इंच पाईपलाईन टाकावी, या भागात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत सुस आणि म्हाळुंगेतील वाड्या वस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सिन्टेक्स टाक्या बसवाव्यात आणि त्यात टँकरने पाणी पुरवावे तसेच या भागातील सोसायटी वर्गाला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी केली होती.

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सुस-म्हाळुंगे या भागातील २०१७ नंतर वाढणारी लोकसंख्या दृष्टिक्षेपात  तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात मूलभूत व पायाभूत सोयी सुविधा भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.गेल्या पाच वर्षांपासून या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी या भागाचे तत्कालीन नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे यांनी  दि. २ ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री/पालकमंत्री अजित दादा पवार यांना लेखी पत्र दिले होते. त्यामध्ये स्पष्ट लिहिले होते की वारजे जलशुद्धीकरण केंद्रा पासून स्वतंत्र एक्स्प्रेस लाईन टाकली तरच या भागाचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल. या बाबीची तत्काळ दाखल घेत  दादांनी आयुक्त व महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कामाच्या सूचना दिल्या.

त्यावर तात्काळ आयुक्त साहेबांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सुचना करून सुस व म्हाळुंगे गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी अश्या सुचना केल्या. अधिकारी वर्गाने देखील आयुक्तांच्या सुचनेची तातडीने दखल घेऊन सर्वप्रथम दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी दैनिक पुढारी या वृत्तपत्रामध्ये पाण्याच्या नव्या लाईन्स टाकणे आणि टँकरने पाणी पुरवठा करणे यासाठी सुस गावासाठी एकुण १ कोटी ३० लाख रुपये व म्हाळुंगे गावासाठी १ कोटी २० लाख रुपये टेंडर प्रसिध्द झालेले होते.

या योजनेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. महापालिका आयुक्त व बाबुराव आप्पा चांदेरे यांच्या  झालेल्या बैठकीत  फेब्रुवारी अखेरपर्यंत एक्सप्रेस लाईनचे काम पूर्ण होऊन २४/७  या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्यांच्या टाक्यांना नियमित व  योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल, असे आयुक्तांनी सांगितले होते.

सुस आणि म्हाळुंगे मनपात समाविष्ट झाल्या झाल्या अवघ्या काही महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने पावले पडताना दिसत होती.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. पुणे मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या भागांच्या सर्वांगिण विकासावर पुण्याचे तत्कालिन पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब हे वैयक्तिकरित्या अतिशय बारकाईने लक्ष देत होते.

दि. १३ मार्च २०२२ रोजी पालकमंत्री म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सुस येथील नाला व पुलाच्या पाहणीसाठी आलेले होते. त्यावेळी त्यांनी येथील गावातील नागरिकांची भेट घेवून पाण्याची देखील अडचण समजून घेतली होती. त्यावेळी त्यांनी नागरिकांकडून निवेदने स्वीकारून, त्यांच्या अडचणी कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन पातळीवर काही निर्णय घेण्यास सुरु केले. 

यादरम्यान दुसरीकडे चांदेरे साहेबांनी सुद्धा आयुक्त साहेबांना पत्र व निवेदने देत आपला पाठपुरावा सुरूच ठेवला होता. दरम्यान खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संग्रामदादा थोपटे साहेब यांनी देखील जातीने लक्ष घालून सुस आणि म्हाळुंगे गावच्या पाणी योजनेसाठी आयुक्त साहेबांची भेट घेतली होती.

चांदेरेसाहेब हे नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्यानेच स्वतः आयुक्त साहेबांनी देखील अतिशय संवेदनशीलपणे ३० एप्रिल २०२२ रोजी सुस भागाचा पाहणी दौरा केला होता.

यावेळी उपस्थित सर्व नागरिकांच्या समोर बोलताना आयुक्तसाहेबांनी येत्या महिनाभराच्या आतच सुस आणि म्हाळुंगेतील प्रत्येक घरापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी लाईन टाकण्याच्या आणि ड्रेनेजच्या कामाला मंजूरी मिळून येत्या वर्षाभराच्या आतच ही कामे केली जातील असं जाहीरपणे सांगितलेले होते.

त्यानंतर दि. ११ मे २०२२ रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यासंदर्भात आयुक्त विक्रमकुमारसाहेब यांची भेट घेतली होती. त्यावेळी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले होते की, "सुस आणि म्हाळुंगेच्या प्रश्नांबाबतीत आत्ताच आयुक्तसाहेबांकडे बैठक झाली आणि आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी सुस म्हाळुंगे बावधन साठी स्वतंत्र अशी १८० कोटी रुपयांची पाण्याची योजना मंजूर केलेली आहे. मा. अजितदादांच्या पुढाकारातून सुस म्हाळुंगे आणि बावधन मध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी पोहोचेल अशी योजना मंजूर झालेली आहे."

त्यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजितदादा आणि महाविकास आघाडी सरकार यांचे अभिनंदन करून आभार देखील मानले होते..

सुस आणि म्हाळुंगेसाठी योजना मंजूर होताच लगेच मा. बाबुरावजी चांदेरेसाहेब यांनी सुस आणि म्हाळुंगे येथे पिण्याच्या पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या उभारणीसाठी जागा निश्चित करण्याचे काम हाती घेतले. सुस मध्ये मा. नामदेवकाका चांदेरे यांच्या बहुमूल्य मदतीने टाक्यासाठी जागा निश्चित केली गेली.
या जागा निश्चितीसाठी चांदेरेसाहेब आणि त्यांचे सहकारी अनेकदा सुस लगतच्या डोंगरावर गेलेले असताना त्यावेळी टेकडीवर वॉकसाठी ये जा करणाऱ्या अनेक नागरिकांची त्यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा झालेली आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे.

त्यानंतर राज्यात ३० जून २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकार जावून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र हे सत्तेत येण्या अगोदरच सुस आणि म्हाळुंगेसाठी पाण्याची स्वतंत्र योजना मंजूर होऊन त्यादृष्टीने कामाची सुरुवात देखील महाविकास आघाडी सरकार असतानाच तत्कालिन पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, खासदार सुप्रियाताई सुळे आणि बाबुरावजी चांदेरे साहेबांच्या पाठपुराव्याने झाली ही सत्य आणि खरी परिस्थिती आहे..

मा. अजितदादांचा दौरा असो, आयुक्तसाहेबांचा दौरा असो की, सुप्रियाताईनी सुस म्हाळुंगेसाठी स्वतंत्र योजना अजितदादांनी मंजूर केलेली घोषणा असो, वरती उल्लेख केलेल्या या प्रत्येक घटनेचे समस्त नागरिक आणि गावकरी हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत..

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात फक्त रिटेंडर झालेल्या कामाचे श्रेय घेवून “वचनपूर्ती” केली अस जाहिररित्या सांगणे म्हणजे राजकीय बलिशपणा आहे..

कोंबडं झाकून ठेवलं म्हणून बांग द्यायला चुकत नाही तसा कोणाचाच खोटेपणा देखील फार काळ टिकत नाही.. जनतेच्या न्यायालयात फक्त सत्याचा विजय होतो हे खोटी “वचनपूर्ती” केलेल्या लोकांनी फक्त लक्षात ठेवावं…