युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेहाऐवजी…; BJP नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
युक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याबाबत भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे भाजपा आमदार अरविंद बेलाड यांनी युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह परत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, एका मृतदेहाऐवजी विमानात दहा जण बसू शकतात.
“विमानात मृतदेह आणण्यासाठी जास्त जागा लागते. मृतदेहासाठी लागणाऱ्या जागेत दहा लोक बसू शकतात आणि ते परत आणता येतात,” असे वक्तव्य बेलाड यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवीनचा मृतदेह युक्रेनमधून परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र त्या देशात युद्ध सुरू आहे, अशा परिस्थितीत त्या लोकांना जिवंत आणणे आणि मृतदेह परत आणणे आणखी कठीण झाले आहे.
बेलाड हे उत्तर कर्नाटकातील भाजपा नेते आहेत. युक्रेनमध्ये मृत्यू झालेला नवीन हा भारतीय विद्यार्थीही याच भागातील आहे. “शासकीय बाजूने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत. पण तिथे युद्ध सुरू आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातील आणि शक्य झाल्यास मृतदेह परत आणला जाईल. जे जिवंत आहेत त्यांना आणणे अवघड आहे. त्यामुळे मृतदेह परत आणणे आणखी कठीण आहे. विमानामध्ये मृतदेह आणण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता असते. मृतदेहासाठी आवश्यक असलेल्या जागेत दहा जणांना बसवून परत आणता येईल,” असे बेलाड यांनी म्हटले आहे.
आधीपासून शिक्षणाबाबत धोरण योग्य असते तर..; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट
नवीन शेखरप्पा ज्ञानगौडा (२१) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचा रहिवासी होता, असे कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुक्त मनोज रंजन यांनी सांगितले. नवीन हा वैद्यकीयच्या चौथ्या वर्षांत शिकत होता. एका दुकानासमोर रांगेत उभा असताना हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याच्या कुटुंबीयांशी बोलून नवीनचा मृतदेह आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. त्यांचे वडील शेखरप्पा यांनी पंतप्रधान मोदींशी बोलताना युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना परत आणण्याचे आवाहन केले. मात्र, अद्याप मृतदेह सापडल्याची माहिती कुटुंबीयांना मिळालेली नाही.
“आम्ही मुलांना जेवण दिले, तुम्ही नाही”; रोमानियाच्या महापौरांनी ज्योतिरादित्य शिंदेंना सुनावले
भाजपा आमदाराचे हे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विधानानंतर आली आहे. जेव्हा वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणारे ९० टक्के विद्यार्थी भारतीय प्रवेश परीक्षा पास करू शकत नाहीत, असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले होते. मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अजूनही अडकले आहेत.




Comments (0)
Facebook Comments (0)