राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना पत्र

राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची 27 फेब्रुवारीला जयंती आहे. त्यांच्या जन्मदिवशी राज्यभरात मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. याच मराठी भाषेच्या दिवशी मराठी भाषेचा धूमधडाक्यात गौरव व्हावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे, असं राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत. राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हणाले? "आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत.

आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. हे इतक्या जोरदारपणे साजरा करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे.

त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा", असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. (पुन्हा एकदा राणे VS शिवसेना वाद पेटणार, नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश) "27 फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.

हा दिवस आपण महराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. गौरव दिवस पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता. पण तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्धत आपण, आपल्या पक्षानी सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरु केली. हा आपल्या भाषेचा गौरव दिवस आहे.

तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा", असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. "लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेने कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा गौरव दिवस आहे हा.

संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरुंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच! अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा", असंदेखील राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.