पुणे-पिंपरीकरांसाठी दिलासा! सुशोभीकरणानंतर ‘सरकार शितोळे सेतू’ पुन्हा वाहतुकीसाठी सुरू
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा मुळा नदीवरील सांगवी-बोपोडी पूल सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाला आता ‘सरकार शितोळे सेतू’ असे नाव देण्यात आले असून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुलाच्या सुशोभीकरणामुळे परिसराचा देखावा अधिक आकर्षक झाला असून सांगवी, बोपोडी आणि आसपासच्या भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या पुलाचे महत्त्व अधिक वाढले आहे.या पुलाचे भूमिपूजन 5 जानेवारी 2022 रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. नुकतेच पुलाच्या सुशोभीकरणानंतर अधिकृत लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाला महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुमारे 760 मीटर लांबीच्या या पुलासाठी अंदाजे 40 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पुलावर उभारण्यात आलेली आकर्षक कमान हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य असून तिची उंची सुमारे 26 मीटर आहे आणि वजन जवळपास 650 टन आहे. वास्तुविशारद श्रुती शहा यांनी या कमानीची रचना केली आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)