Supriya Sule : पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? सुप्रिया सुळेंचा जमावबंदीवरून खरमरीत सवाल

Supriya Sule : पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? सुप्रिया सुळेंचा जमावबंदीवरून खरमरीत सवाल

Supriya Sule : पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सवाल उपस्थित केले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज 26 मे पासून ते ८ जून २०२६ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. जवळपास 14 दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरत असल्यामुळे पुढी 14 दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद आणि इतर सणांच्या काळात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मावबंदीवरून खरमरीत सवाल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत, “पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? असा सवाल केला आहे.”


पुढे त्या म्हणाल्या की, “एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत? ”

https://x.com/supriya_sule/status/2059138965823795260?s=20


“नेमका प्रतिबंध कशाला आहे?”

पोस्टच्या शेवटी त्यांनी, “पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे असे म्हटले आहे.”