“द केरला स्टोरी हा सिनेमा प्रत्येक हिंदू मुलीने आणि महिलेने पाहिला पाहिजे कारण…”
‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरर यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर केरल स्टोरी मध्ये जे दाखवण्यात आलं आहे ते भोपाळमध्येही घडतंय असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे. द केरला स्टोरी हा सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.
काय म्हटलं आहे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी?
“लव्ह जिहादच्या नावे महिलांची, मुलींची फसवणूक केली जाते. त्यांना यामध्ये अडकवलं जातं. त्यानंतर त्यांच्यासह घडणाऱ्या घटना या भयंकर असतात. द केरला स्टोरी हा सिनेमा प्रत्येक महिलेने, मुलीने पाहिला पाहिजे. त्यामुळे त्या स्वतःचं अशा गोष्टींपासून संरक्षण करु शकतील. तसंच कुटुंबाचं आणि मुलांचंही रक्षण करु शकतील” असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा?
द केरला स्टोरीमध्ये जे दाखवण्यात आलं आहे ते फक्त केरळमध्ये घडत नाही. या गोष्टी भोपाळमध्येही घडत आहेत. आमच्याकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. मी याआधीही यावर भाष्य केलं आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना फसवलं जातं. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले जातात. प्रत्येक हिंदू मुलीने हा सिनेमा बघितला पाहिजे. दहशतवादाचं षडयंत्र लव्ह जिहादच्या माध्यमातून पेरलं जातं आहे. त्यांना आपल्या देशाच्या विरोधात उभं करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. भारतातल्या गद्दारांकडून अशा गोष्टींना संरक्षण दिलं जातं.
फक्त हिंदू मुलींनाच नाही तर मुलांनाही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवलं जातं. त्यांना दहशतवादात ढकललं जातं. हिंदू मुली आणि मुलं यांचं धर्मांतरण केलं जातं. हा अजेंडा राबवला जातो आणि त्याला देशातले गद्दार साथ देत आहेत असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)