कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक निर्णय, सरकारकडून थेट खरेदी जाहीर..

कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक निर्णय, सरकारकडून थेट खरेदी जाहीर..

सातारा : राज्यात सध्या कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळे अनेक शेतकरी संतप्त झाले होते आणि काहींनी तर निषेध म्हणून आपला कांदा रस्त्यावर फेकून दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकार थेट शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किमान हमीभाव मिळण्यास मदत होणार आहे. या निर्णयापूर्वी मुख्यमंत्री यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर शासनाने कांद्याची खरेदी १२ रुपये ३५ पैसे प्रति किलो या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्रालय समोर शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांदा फेकून संताप व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.