रोहित शर्मा ठरला विराट कोहलीवर भारी
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्धच्या विजयानंतर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. या यादीत विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा आता टॉपला पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या टी २० विश्वचषकातून भारत लवकर बाहेर पडल्यानंतर कोहलीने कर्णधारपद सोडले. यावेळेस टीम इंडियाची धुरा शर्माच्या हाती सोपवण्यात आली. भारतीय सलामीवीर रोहित शर्माचा कर्णधार म्हणून खेळताना मैदानावरील प्रत्येक निर्णय प्रभावी ठरला आहे आणि ते त्याच्या विक्रमातही दिसून आले आहे.
भारत विरुद्ध हाँगकाँग हा रोहित शर्माच्या टी- २० कारकिर्दीत कर्णधार म्हणून खेळलेला ३७ वा सामना होता. हाँगकाँग विरुद्ध विजयानंतर शर्माच्या नावे ३१ विजय नोंदवले गेले आहेत. भारताचा कर्णधार म्हणून कोहलीने ५० सामन्यांतून ३० विजय मिळवले आहेत. यशस्वी कर्णधारांच्या यादीत या क्षणी महेंद्रसिंग धोनी अव्व्ल आहे, ज्याने ७२ सामन्यांतून आपल्या नेतृत्वाखाली भारताला ४१ टी- २० सामने जिंकण्यास मदत केली आहे. २०१८ मध्ये अफगाणिस्तान विरुद्धचा बरोबरीचा ससामन्याचा अपवाद वगळल्यास रोहितच्या नेतृत्वाखाली भारत अपराजित राहिला.
रोहित शर्माने संघाच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना, संघाला गोलंदाजीच्याबाबत आणखी सरावाची गरज आहे असेही भाष्य केले. हॉंगकॉंगच्या संघाने कालचा सामना हरूनही अटीतटीची लढत केल्याने क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळवली आहे.
भारताने बुधवारी हाँगकाँगविरुद्ध सामन्यात विजय प्राप्त करत अव्व्ल चारमध्ये स्थान मिळवले. भारतीय फलंदाजांची सुरुवात संथ झाली असताना, कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी शेवटी फटाक्यांची आतिषबाजी करत संघाने २० षटकांत दोन गडी गमावून १९२ धावांपर्यंत मजल मारली होती. सूर्यकुमार यादव (नाबाद ६८ धावा) आणि विराट कोहली (नाबाद ५९) यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सामन्यात हाँगकाँगवर ४० धावांनी मात केली.




Comments (0)
Facebook Comments (0)