शिंदे-फडणवीसांची बैठक; अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होणार?

शिंदे-फडणवीसांची बैठक; अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासंदर्भातील आवाहन भारतीय जनता पार्टीला केलं आहे. रविवारी दिवसभर सुरु असणाऱ्या या आवाहनांनंतर भाजपाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये निवडणूक लढवण्याच्या बाजूने स्थानिक नेत्यांचा मतप्रवाह असल्याचं दिसून आलं. निवडणूक लढवण्यासंदर्भातील अंतिम निर्णय फडणवीस यांनी घ्यावा असं ठरवण्यात आलं असून केंद्रीय नेतृत्वाशी फडणवीस यासंदर्भात चर्चा करणार असल्याची शक्यात आहे. असं असतानाच आता फडणवीस सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस आणि शिंदेंमध्ये पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे त्यामुळे आजच्या शिंदे आणि फडणवीस यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भाजपाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मात्र ही उमेदवारी मागे घ्यावी आणि शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांची बिनविरोध निवड करावी यासाठी भाजपावर राजकीय दबाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या निवासस्थानी काल रात्री दीड तास भाजपा नेत्यांची बैठक झाली. यामध्ये पोटनिवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना राज यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठविले असले तरी आता शेवटच्या क्षणी काही भूमिका घ्यायची असेल तर एकट्याला निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी पक्षात चर्चा करावी लागणार आहे, वरिष्ठांशी बोलावे लागणार आहे. आमच्याबरोबर बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चेअंती घेतला जाईल असेही फडणवीस यांनी रविवारीच स्पष्ट केले होते. त्यामुळेच रविवारी रात्रीच्या बैठकीनंतर आता फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये साडेअकरा वाजता चर्चा होणार असल्याचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे. या चर्चेनंतरच ठाकरे गटाविरोधात निवडणूक लढवायची की माघार घ्यायची यासंदर्भातील घोषणा भाजपा आणि शिंदे गट करणार असल्याचे समजते.

रविवारी रात्री फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाचा नेते निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत असल्याचं या बैठकीमध्ये दिसून आलं. मात्र या निवडणुकीबद्दलचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. भाजपाचं स्थानिक नेतृत्व ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं आहे.

अंधेरीत शिवसेनेचा विजय झाल्यास त्याचा आगामी मुंबई पालिका निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. शिवसेनेचे नैतिक बळ तर वाढेलच पण मतदारांमध्ये शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते. भाजपाले हे टाळायचे आहे. अंधेरीत यशाबद्दल भाजपाचे नेते साशंकच आहेत. यामुळेच अंधेरीबाबत भाजपामध्ये वेगळा मतप्रवाह असल्याचे समजते.