“महाराष्ट्रातले खरे गद्दार उद्धव ठाकरेच, कुणालाही गद्दार म्हणायचा…”
शिवसेनेतल्या सर्वात मोठ्या फुटीनंतर मुंबईत आज दोन मेळावे पार पडत आहेत. एक आहे उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. या दोन मेळाव्यात हे दोन्ही नेते काय बोलणार? याची उत्सुकता लागली आहे. अशातच कल्याणमध्ये भाजपाचा मेळावा पार पडतोय. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. खरे गद्दार तुम्हीच आहात, आमच्यासह निवडून आलात आणि खुर्चीसाठी गद्दारी केलीत तुम्हाला इतर कुणालाही गद्दार म्हणायचा अधिकार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
“सत्ता कशी असते? खुर्ची कशी असते? उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही आम्हाला लोटलं. आम्ही त्यांना लोटलं नाही. ती खुर्ची तुम्हाला आ जा आ जा म्हणत होती. त्या खुर्चीकडे पाहून तुम्हीही आ रहाँ हूँ म्हणत होते. भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला पूर्ण बहुमत महाराष्ट्राने दिलं. त्यावेळी तुम्ही मतं मागत असताना भारतीय जनता पक्षासह मतं मागितली होती. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रात युतीच्या सरकारसाठी मतं मागितली होती. निवडणूक झाली आणि नियत बदलली. खुर्चीसाठी विचारांचा सौदा झाला.”
खरे गद्दार उद्धव ठाकरेच
“खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात गद्दारी कुणी केली असेल तर उद्धव ठाकरे ती गद्दारी तुम्ही केली. आमच्यासोबत, आमच्याबरोबर निवडून आलात आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमच्याशी गद्दारी केली. खुर्चीसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात. गद्दार हे जर महाराष्ट्रात कुणाला म्हणायचं असेल तर पहिली गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली आहे. खरे गद्दार तुम्हीच आहात, दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही.”
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह आलेल्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसह मतं मागितली नव्हती
“एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले, ज्यांच्यासोबत मतं मागितली त्यांच्यासोबत ते परत आले. ज्या विचारांसाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस लोकांना निवडून दिलं होतं त्यासाठी ते सोबत आले. या चाळीस लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मतं मागितली नव्हती. या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत मतं मागितली होती. मोदींचे मोठमोठे फोटो लावून तुम्ही मतं मागितली. निवडणुकीनंतर तुम्ही (उद्धव ठाकरे) गद्दारी केली. तुम्हाला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. आज यांची अवस्था अशी आहे की जसे संताजी धनाजी यांची जशी दहशत होती की मुघलांना जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी संताजी आणि धनाजीच दिसायचे. रात्री झोपेतून दचकून मुघल उठायचे. अशी दहशत होती. आता मोदींचं आणि अमित शाह यांचं नाव घेतलं की अशीच अवस्था उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस वाल्यांची होते आहे.”
“उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ते काही भाषण होतं का? त्याला भाषण म्हणायचं का? ती ओकारी होती. मी असे शब्द वापरत नाही पण मला वापरण्यासाठी तेच मजबूर करत आहेत. यांची अवस्था अशी आहे की त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोदीजी आणि अमित शाहच दिसत आहेत.” असं म्हणत उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी घणाघाती टीका केली आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)