बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत?
बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली होती. यावेळी पवार यांनी सामंत यांना स्थानिकांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्याचा सल्ला दिला. यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी पवार यांच्या सल्ल्यावरही उलट प्रश्न केला आहे.
दोन दिवसापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना बारसू संदर्भात सल्ला दिला होता. यावेळी पवार म्हणाले, बारसूमध्ये काही घाईने करु नका, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन समजावून सांगा. स्थानिकांविरोधात पोलीस बळाचा वापर करु नका असाही सल्ला पवार यांनी दिला होता. यावर आज खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत उलट प्रश्न केला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले, बारसू संदर्भात खासदार शरद पवार यांनी सांगितलं स्थानिकांना विश्वासात घ्या, म्हणजे काय करायचं, त्याचा या सरकारवर विश्वासच नाही. काल उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात आपली भूमीका स्पष्ट केली आहे. त्यांनी ठाकरे यांच्या पत्राचा मुद्दा सांगत होते. केंद्राकडून पर्यायी जागेसाठी आग्रह होता, त्यामुळे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागा सुचवली आहे. पण महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी जागा ताब्यात घेण्यासाठी जोरजबरदस्ती केलेली नाही, असंही राऊत म्हणाले.
ज्या पद्धतीने कोकणातील जनता रस्त्यावर उतरली आहे, आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. अशावेळेला हे वातावरण चिघळत ठेवण्यापेक्षा भूसंपादन मागे घ्यायला हवे, असंही राऊत म्हणाले. सर्वाच आधी ज्या राजकारण्यांनी बारसूच्या आसपास जमीनी खरेदी केली आहे, त्या सर्व परप्रांतीयांची यादी सरकारकडून अधिकृत जाहीर करावी, नाहीतर खासदार विनायक राऊत लवकरच ती यादी जाहीर करतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
कोकणातील रिफायनरी संदर्भात शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटामध्ये वेगवेगळी मत असल्याचे दिसत आहे. आज बारसू येथील रिफायनरी विरोधात शिवसेना ठाकरे गट मोर्चा काढणार आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)