राज ठाकरे यांची महाविकास आघाडीवर सडकून टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं. विशेषतः गेल्या काही दिवसातल्या घडामोडींबाबत राज ठाकरे काय भुमिका घेणार, काय मत व्यक्त करणार याची एकच चर्चा सुरु होती. संपुर्ण सभेत महाविकास आघाडीवर सडकून टीका करतांना भाजपावर टीका करणे राज ठाकरे यांनी टाळले. उलट भाजपाचे अनेक मुद्दे उचलून धरले. यामुळे येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडुकांमध्ये मनसे उघडपणे भाजपाला साथ देणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद शिवसेनाला देण्याबाबत कुठलाही शब्द देण्यात आला नव्हता हे भाजपच्या नेत्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी शिवसेनाला जोरदार लक्ष्य केलं. यानिमित्ताने एकत्र आलेले महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष हे मतदारांना कसे गृहित धरत आहेत हा मुद्दा राज ठाकरे यांनी आक्रमकपणे मांडला.
मुंबईतील भाजपाच्या नेत्यांनी मशिदीवरील भोग्यांचा मुद्दा गेले काही दिवस जोरदारपणे लावून धरला आहे. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी जोरदार प्रहार केले. मशिदीच्या समोर आणखी मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे सांगत मला अरे ला कारे करणारे माणसे हवीत असं वक्तव्य करत हा मुद्दा लवकर संपणार नसल्याचे एक प्रकारे संकेत दिले.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापन केल्यावर नोकरीसाठी महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांचा मुद्दा लावून धरला होता. त्यावेळी बिहारप्रमाणे उत्तर प्रदेश सारख्या राज्यांवर सडकून टीका केली होती. आज भाषणात उत्तर प्रदेश प्रगती करत असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे मोदी यांचे कौतुक केले.
शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही भाजप प्रामुख्याने लक्ष्य करत आहे, टीका करत आहेत. तोच मुद्दा राज ठाकरे यांनी आज पुढे नेला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका राज ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं, राज्यात जातीय द्वेष वाढला असल्याची टीका करत भाजपा आणि मनसेचा सध्याच्या राजकीय शत्रू एकच असल्याचं या सभेच्या माध्यमातून एकप्रकारे दाखवून दिलं.
एंटिलिया, सचिन वझे, नवाब मलिक या मुद्दयांबाबतही भाजपाप्रमाणे राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. आता स्फोटकं ठेवल्याच्या मुद्द्याचं काय झालं असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी भाजपाचीच री ओढली.
महाविकास आघाडी आणि देशातील इतर राजकीय पक्ष हे महागाई, इंधनाचे वाढते दर, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर अशा विविध मुद्द्यांवर भाजपावर सडकून टीका करत आहेत. मात्र यापैकी एकाही मुद्द्याला राज ठाकरे यांनी हात लावला नाही, भाजपावर टीका केली नाही. उलट हे सर्व मुद्दे टाळत राज ठाकरे यांनी त्यांच्या सुमारे ५४ मिनीटांच्या भाषणात उद्धव ठाकरे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांना लक्ष्य केलं.
यामुळे राज ठाकरे येणाऱ्या काही दिवसांत कोणते राजकीय पाऊल उचलणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.




Comments (0)
Facebook Comments (0)